कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव
नवी दिल्ली – कर्नाटकातील राजा राजेश्वरी नगर विधानसभा मतदार संघातील एका सदनिकेत मोठ्या प्रमाणात बनावट ओळखपत्रे सापडल्याच्या कारणावरून कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन भाजपवर कारवाईची मागणी केली आहे. भाजपने कर्नाटकात काल हा मिडनाईट ड्रामा करून कॉंग्रेसवरच आरोपांच्या उलट्या बोंबा मारल्याची कॉंग्रेसची तक्रार आहे. या बनावट मतदार पत्र प्रकरणात भाजपचेच लोक सामिल असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.
आयकर खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपने हा ड्रामा चालवला आहे असा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारी यंत्रणांच्या मदतीने कॉंग्रेसने कर्नाटकात बोगसगिरी चालवली असून त्या विषयाचे तपशीलवार निवेदन आम्ही निवडणूक आयोगाला दिले आहे असे कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने सांगितले. भाजपने कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पैशाचाही वापर चालवला असल्याचे या तक्रार निवेदनात नमूद करण्यात आले आहे.