काश्मीरमध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून जनजागृती मोहीम सुरू
जम्मू-काश्मीर | महाईन्यूज
- ३८ जण भेट देणार; विशेष दर्जा रद्द केल्यानंतरच्या लाभांबाबत देणार माहिती
जम्मूत विमान उतरू न शकल्याने केंद्र सरकारमधील तीन मंत्री शनिवारी श्रीनगर येथे दाखल झाले. त्यांचे विमान जम्मूहून श्रीनगरकडे वळवावे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत एकूण ३८ मंत्री जम्मू काश्मीरला सहा दिवसांत भेट देणार आहेत. हे मंत्री ६० सभा घेऊन लोकांना अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या फायद्यांची व सरकारी योजनांची माहिती देऊन जनजागृती करणार आहेत.
शनिवारी दाखल झालेल्या मंत्र्यात अर्जुन मेघवाल, अश्विनी चौबे, जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे. त्यांचे विमान काश्मीरची हिवाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील विमानतळावर उतरले. हे मंत्री येथे मुक्काम करणार की लगेच परत जाणार आहेत हे समजलेले नाही. यानंतर मंत्र्यांचे दुसरे पथक मंगळवारी येथे येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील जनतेत शांततेचा संदेश पोहोचवण्याची कामगिरी ३८ मंत्र्यांवर सोपवली आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात या भागाचा विकास होणार असून त्यात ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांचा समावेश असेल असे हे मंत्री लोकांना समजावून सांगणार आहेत. या संपर्क कार्यक्रमात एकूण ३८ मंत्री सहभागी होणार असल्याचे मुख्य सचिव बी.व्ही.आर सुब्रमण्यम यांनी जम्मूतील आढावा बैठकीनंतर सांगितले आहे.