अहमदनगर, यवतमाळमध्ये ‘त्यांचा’ शोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/7-17.jpg)
नागपूर | दक्षिण दिल्लीतील निझामुद्दीन भागात हजारोंच्या उपस्थितीत मार्चच्या पूर्वार्धात पार पडलेल्या ‘तबलिगी जमात’चं संमेलन पार पडले. या कार्यक्रमाला देश-विदेशातून तसेच १९ राज्यांतून आलेल्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे हा भाग करोना प्रसाराचे केंद्र होण्याची भीती असतानाच, अहमदनगरमधील ४६ लोक, तसंच यवतमाळमधील १२ जण सहभागी झाल्याची माहिती उघड झाली आहे.
दिल्लीतील कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण ४६ लोक सहभागी झाले होते, अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. या ४६ लोकांमध्ये २९ जण हे विदेशातील आहेत. तर इतर सहा जण हे आपल्या देशातील आहेत. त्यातील ३५ जणांना आरोग्य विभागानं ताब्यात घेतलं आहे. इतर ११ जणांचा शोध घेण्यात येत आहे, असंही द्विवेदी यांनी सांगितलं. विदेशी नागरिकांना ज्यांनी थारा दिला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.