अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नागपुरात 22 हजार हेक्टर शेतीचे नुकसान : जिल्हाधिकारी
नागपूर | नागपूर जिल्ह्यात काल झालेल्या गारपिटीमुळे तब्बल 22 हजार हेक्टर क्षेत्रात शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वच 13 तालुक्यांमध्ये 2 जानेवारीला अवकाळी पाऊस झाला असून 116 गावांमध्ये गारपीट झाल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे. या गावांमधील शेती अक्षरश: भुईसपाट झाली आहे.
सर्वाधिक नुकसान कापसाच्या शेतकऱ्यांचे झाले असून तब्बल 13 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक गारपिटीमुळे वाया गेले आहे. तर 4 हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा आणि मोसंबी या फळ पिकांचे आणि 3 हजार हेक्टरवरील तूर पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात काल गारपीट झाली. अवकाळी पाऊस तसंच गारपीटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आजही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरणार आहेत.