‘अर्थव्यवस्थेचे पुढे काय करायचे याबद्दल मोदी सरकार अनभिज्ञ’
नवी दिल्ली | देशाच्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली. मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचे पुढे काय करायचे, याबद्दल मोदी सरकार पूर्णपणे अनभिज्ञ असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली.
या शनिवारी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडण्यात येणार आहे. निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी अर्थव्यवस्था उलट्या दिशेने नेली आहे. पूर्वी विकासदर ७.५ टक्के होता आणि चलनवाढीचा दर ३.५ टक्के.
आता विकासदर ३.५ टक्क्यांवर आला आहे आणि चलनवाढीचा दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोघांनाही आता पुढे काय करायचे याची काहीही माहिती नाही. ते दोघेही याबाबत अनभिज्ञ आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.