सरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन
नवी दिल्ली – बँकांच्या खासगीकरणाविरोधात देशातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दोन दिवस संप पुकारला होता. अर्थसंकल्पात आयडीबीआयसह दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली होती. याच्याविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. सरकारच्या या धोरणाविरोधात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील टीका केली आहे.
सरकारी बँका उद्योजकांना विकल्या गेल्या तर ती ‘खूप मोठी चूक’ ठरेल, असे म्हणत रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राजन म्हणाले की, मला वाटते उद्योग समूहांना सरकारी बँका विकणे मोठी चूक ठरेल. एखाद्या चांगल्या बँकेला परदेशी बँकांना विकणे राजकीयदृष्ट्या शक्य होणार नाही.
वाचा :-सर्वच सरकारी बँकांचे खासगीकरण होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
रघुराम राजन म्हणाले की, 2021-22 मध्ये सरकारने अर्थसंकल्पात खासगीकरणाला खूप महत्त्व दिले आहे, परंतु त्यावर काम करण्यात सरकारचा इतिहास आतापर्यंत चांगला राहिलेला नाही. त्यामुळे यंदा नवीन काय असेल, माहित नाही.सरकारने अर्थसंकल्पात खासगीकरणाद्वारे 1.75 लाख कोटी रुपये जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एका विमा कंपनीच्या खाजगीकरणाची योजना आहे. यावर बोलतान राजन म्हणाले की, देशातील एक खासगी बँक एक सार्वजनिक बँकेला खरेदी करण्याच्या स्थितीमध्ये असू शकते. मात्र त्यांना असे करायचे आहे की नाही मला माहित नाही.
भारताने 2024-25 पर्यंत 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था साकार करण्याचे ठेवलेले उद्दिष्ट फार महत्त्वाकांक्षी असून करोना काळाच्या आधीही हे लक्ष्य ठरवताना काळजीपूर्वक आकडेमोड केलेली दिसत नाही. पतधोरण हे चलनवाढ खाली आणू शकते यावर आपला विश्वास आहे. रिझर्व्ह बँकेला काही प्रमाणात लवचीकता दिल्यास त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो, असेही राजन म्हणाले.