पुढील तीन ते चार दिवसांत मुंबईसह राज्यातील थंडी आणखी वाढणार
मुंबई | प्रतिनिधी
राज्याच्या अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत काल १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये २५ अंशाखाली कमाल तापमान नोंदवले गेले आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणामदेखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होऊन थंडी वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्यात मागील २४ तासांपासून पावसाचे वातावरण होते. अशातच वातावरणात गारवादेखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी, थंडीत वाढ
महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुणेसह महाराष्ट्रात काही ठिकाणी २२ आणि २३ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.
राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान १६ अंशांवर पोहोचले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
: