साताऱ्यात कठोर निर्बंधांमुळे व्यापारी, जनता त्रस्त
- साताऱ्यात करोना नियंत्रणात न आल्याने पेच
कराड |
सातारा जिल्ह्यतील करोना संसर्गाचा फैलाव घटत नसल्याने शासकीय यंत्रणा र्निबधांवर ठाम आहे. तर, दुसरीकडे गेल्या १६ महिन्यातील सततच्या टाळेबंदी व नियम, अटींच्या चौकटींमुळे कष्टकरी जनता व व्यापारीवर्ग कमालीचा त्रासल्याने त्यांनी व्यापार, उद्योग व रोजगार संपूर्ण खुले करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा आणि र्निबधांना वैतागलेले सामाजिक घटक आमने-सामने येऊ लागले आहेत. करोनासंकटाच्या अनुषंगाने गेल्या पाच दिवसांपासून कठोर निर्बंध अमलात असताना, आज बुधवारी ताज्या आकडेवारीनुसार करोना रुग्ण निष्पन्नतेचा दर ११.१५ टक्के असा उंचावलेला राहताना त्यात करोनाच्या १०,४९५ चाचण्यांमध्ये १,१७० जण बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर, काल करोनाबळींची संख्या २६ वर झेपावली होती. ती आज १८ पर्यंत खाली आली. एकंदर चित्र पाहता करोना रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू असतानाही या संसर्गाचा आटोक्यात न येणारा फैलाव ही चिंतेची बाब आहे.
या परिस्थितीवर प्रशासनाने नेमकेपणाने उत्तर द्यावे, करोना अटकावासाठी कठोर निर्बंध आणि टाळेबंदी हेच पर्याय आहेत का? आणि शासकीय यंत्रणा नेमकेपणाने काम करते का? असे एक ना अनेक प्रश्न लोकांमधून उपस्थित होताना, अशा महासंसर्गाच्या कालावधीत सहकारी संस्थांच्या निवडणुका, कार्यक्रम कसे चालतात? कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुरक्षित शारीरिक अंतर संबंधित सहकारी खात्यानेतरी पाळले का? असे प्रश्न संतप्तपणे लोक विचारू लागले आहेत. कराड तालुक्यातील करोना फैलावाला कृष्णा कारखान्याची करोनाचे निर्बंध पायदळी तुडवून झालेली निवडणूकच कारणीभूत असल्याचा आरोपही लोक करू लागले आहेत. करोनाच्या अनुषंगाने व्यापार, उद्योग व रोजगारावर टाच आणू नये म्हणून भाजप, मनसे, व्यापारी, सामाजिक, शेतकरी संघटना रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत. याबाबत जिल्ह्यत ठिकठिकाणी प्रशासनकर्त्यांना निवेदनेही सादर करताना, व्यापारी व जनतेने संतप्त प्रतिक्रिया नोंदवताना, अन्यायाची सल बोलून दाखवली आहे.