“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू नाही”; उत्तर प्रदेश सरकारचा दावा
![“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू नाही”; उत्तर प्रदेश सरकारचा दावा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/oxygen_tank.jpg)
नवी दिल्ली |
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने केला आहे. राज्यात तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू असून काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी विधान परिषदेत करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूची माहिती मागवली होती. यावर राज्याचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांनी लेखी उत्तर दिले आहे की, राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.
उत्तर प्रदेशात तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू आहे. १७ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस आमदाराच्या प्रश्नावर, राज्याचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांनी लेखी उत्तर देताना सांगितले की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूची नोंद झाली नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याबाबत माहिती मागवण्यात आली होती. लोकसभेत लेखी उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे करोना रुग्णांच्या मृत्यूची माहिती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मागवण्यात आली होती, मात्र आतापर्यंत फक्त पंजाब आणि अरुणाचल प्रदेशने ही आकडेवारी दिली आहे. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अधिवेशनात केंद्र सरकारनेही देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता. मात्र, विरोधकांच्या गदारोळानंतर सरकारने उत्तर दिले की, राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. नंतर, सरकारने संसदेत सांगितले की, आंध्र प्रदेशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत काही लोकांचा मृत्यू झाला. देशात करोनाची दुसरी लाट एप्रिल ते जून दरम्यान आली आणि या काळात देशात हजारो लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये उत्तर प्रदेशातही शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या सर्व भागात ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या बातम्या आल्या आणि उत्तर प्रदेशही त्याला अपवाद नव्हता. सर्वत्र ऑक्सिजनसाठी रांगा लागल्या होत्या आणि यादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूचे कारण ऑक्सिजन न मिळणे असल्याचे सांगण्यात आले.