स्मृतिभ्रंश समस्येवर प्रभावी पर्याय म्हणजे ध्यानधारणा!
पुणे : स्मृतिभ्रंश हा आजार कधीही न बरा होणारा आहे; त्यामुळे याचे दुष्परिणाम कमी होतील, असे उपाय करणे हेच आपल्या हातात आहे. स्मृतिभ्रंशाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी ध्यानधारणा फायद्याची आहे, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे, अशी माहिती कोलकाता येथील अपोलो रुग्णालयाचे मेंदूविकार विभागाचे प्रमुख डॉ. अमिताभ घोष यांनी दिली. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘सत्यम’ उपक्रमांत डॉ. अमिताभ घोष यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.विस्मरणासारख्या आजारांची सुरुवात असलेल्या रुग्णांनी ध्यानधारणेला दैनंदिन वेळापत्रकात स्थान द्यावे, असे आवाहन घोष यांनी केले.
स्मृतिभ्रंशाच्या प्राथमिक टप्प्यात किंवा विस्मरण होते आहे, अशी शंका आल्यास दररोज किमान ३० मिनिटे केलेले मेडिटेशन केल्याने रुग्णांच्या मेंदूतील स्मृतिभ्रंश वाढवणारे बदल (स्ट्रक्चरल चेंजेस) संथ गतीने होतात, डॉ. घोष यांनी सांगितले. मेंदूशी संबंधित विकारांवर योगासने, नृत्य, कला अशा अनेक घटकांचा सहायक उपचार पद्धती म्हणून वापर केला जातो.
मेडिटेशनच्या परिणामांच्या अभ्यासण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले. संशोधन अधिकाधिक अचूक करण्यासाठी स्मृतिभ्रंशाची सुरुवात झालेले मेडिटेशन करणारे आणि न करणारे अशा दोन गटांतील रुग्णांच्या नियमित चाचण्या (एमआरआय) करून मेंदूतील बदलांचा तौलनिक अभ्यास केला. त्यात स्मृतिभ्रंशाच्या वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या ‘ग्रे एरिया’ची वाढ रोखण्यात मेडिटेशनने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे लक्षात आले. या संशोधनाची दखल ‘फ्रंटियर्स इन ह्युमन न्यूरोसायन्स’ या वैद्यकीय नियतकालिकाने घेतली आहे. स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसल्यानंतर निदान होईपर्यंत बराच वेळ जातो. ५०-६० वर्षे वय या व्यक्तिगत-व्यावसायिक प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसल्याने रुग्णांचे नुकसान होते. जीवनशैलीतील बदल हा आज सर्व आजारांचे मूळ ठरत आहे. नकारात्मक विचार, नैराश्य, ताणतणाव या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठीही ध्यानधारणेचा उपयोग होतो.