#DeltaPlusVariant: आता ‘डेल्टा प्लस’चा धोका!; महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेशला केंद्राचा सतर्कतेचा इशारा
![No deaths due to corona in Nagpur in last 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5174671_1920-1-3.jpg)
- महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेशला केंद्राचा सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली |
देशाला आता करोनाच्या उत्परिवर्तीत ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका आहे. ‘डेल्टा प्लस’ हा चिंताजनक विषाणू असून, त्याचे रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश या राज्यांना केंद्राने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘डेल्टा प्लस’ हे करोनाचे ‘निरीक्षणाधीन उत्पर्विन’ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, ‘इन्साकॉग’ने ‘डेल्टा प्लस’ हे ‘चिंताजनक उत्परिवर्तन’ असल्याची माहिती दिल्याचे आरोग्य मंत्रालयाने नंतर जाहीर केले. केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते.
महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीत सुरुवातीला सहा रुग्णांमध्ये ‘डेल्टा प्लस’ आढळले होते. त्यानंतर ५० जणांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यातून आणखी तीन जणांमध्ये हा विषाणू आढळला असून रत्नागिरीत या विषाणूचे सध्या नऊ रुग्ण झाले आहेत. ‘डेल्टा प्लस’ बाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे यावरून सध्या कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. राज्यात दर महिन्याला ३ हजार जणांचे नमुनेजनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविले जात असून पाच रुग्णालये आणि पाच प्रयोगशाळांमधील नमुनेही पाठविले जात आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सुरूच राहिल, असे राज्याच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.