#Covid-19: धक्कादायक! दिल्लीत प्राणवायूअभावी २५ जण दगावले
मुंबई |
करोनाची लागण झाल्याने अत्यवस्थ स्थितीत असलेल्या २५ रुग्णांचा गेल्या २४ तासांत प्राणवायूच्या तुटवड्यामुळे येथील सर गंगाराम रुग्णालयात मृत्यू झाला. आणखी अन्य ६० रुग्णांची अवस्थाही बिकट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राणवायूचा दाब कमी झाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाला असावा, असे सूत्रांचे म्हणणे आहे, तर या रुग्णालयात प्राणवायूचा पुरेसा साठा शिल्लक होता आणि प्राणवायूचा पुरवठा करणारा टँकरही रुग्णालयात पोहोचला होता, असे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
सकाळी ९.२० वाजता टँकर रुग्णालयात पोहोचला, जवळपास पाच तास पुरेल इतका साठा होता, असे रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले. मात्र प्राणवायूचा अखंडित आणि योग्य वेळी पुरवठा होणे गरजेचे आहे, असे रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी म्हटले आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सरकारला तातडीचा संदेश पाठविला आणि केवळ पाच तास पुरेल इतकाच प्राणवायूचा साठा असल्याचे सांगून तातडीने पुरवठा करण्याची विनंती केली.
परिस्थिती बिकट…
या रुग्णालयात ५०० हून अधिक करोनाबाधित रुग्ण आहेत, त्यापैकी १५० हून अधिक जणांना प्राणवायूचा उच्च क्षमतेने पुरवठा करण्याची गरज आहे, व्हेण्टिलेटर्स आणि अन्य संबंधित यंत्रे परिणामकारकपणे सुरू नाहीत, येथील आणखी ६० रुग्णांची अवस्थाही अत्यंत बिकट आहे, मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.