#Covid-19: ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणावर कमतरता
- एकही जीवरक्षक प्रणाली नाही, प्राणवायूच्या केवळ पाच खाटा
विरार |
वसईच्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा जाणवू लागली आहे. केवळ दोन करोना उपचार केंद्र असून त्यात केवळ पाच प्राणवायूच्या खाटा आहेत. एकही जीवन रक्षक प्रणाली यंत्र नाही. यामुळे रुग्णांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. वसई-विरार शहराचे दोन भाग तयार केले असून यातील शहरी भाग हा महापालिका प्रशासन तर ग्रामीण भाग हा जिल्हा प्रशासनाकडे आहे. यामुळे करोना काळात दोन वेगवगेळ्या स्तरांवरून नियोजन केले जात असल्याने ग्रामीण भागातील जनतेचे उपचासाराठी हाल होत आहेत. ग्रामीण भागात सध्या करोना बाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य सुविधांचा कमी जाणवत आहे. सध्या वसईच्या जी जी कॉलेज येथे १०० रुग्णांसाठी उपचार केंद्र आहे. यात केवळ ५ प्राणवायू खाटा आहेत. सध्या ग्रामीणमध्ये आजतागायत १८७४ रुग्ण करोना बाधित झाले असून २७० रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. तर ८४ करोनाग्रस्तांचा बळी गेला आहे.
वसई ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णाचे आकडे वाढत आहेत. यामुळे वसई ग्रामीण भागात करोना केंद्राची वाढ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण पालिका क्षेत्रात ग्रामीण भागातील रुग्ण घेतले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे उपचारासाठी रुग्णांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक वेळा वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावले आहेत. यामुळे ग्रामीण भागात अतिदक्षता विभाग आणि प्राणवायू खाटांची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी माहिती दिली की, त्यांनी वाढती रुग्णसंख्या पाहता ग्रामीण भागासाठी ५ अतिदक्षता विभाग आणि १५ प्राणवायू खाटांची मागणी केली आहे. पण अजूनही यावर जिल्हा प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.