#CoronaVirus: कोरोना विषाणू शरीराच्या बाहेर काढून जिवंत ठेवणं म्हणजे नेमकं काय? नीट समजून घ्या
करोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे सरकार लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असताना दुसरकीडे भारतीय शास्त्रज्ञ करोनावर लस शोधण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे करोना विषाणू शरीराच्या बाहेर जिवंत ठेवणं. म्हणजे नेमकं काय याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे.
“करोनाचे विषाणू शरीरातून बाहेर काढून जिवंत ठेवणं सोपं नसतं. पण पुण्यातील वैज्ञानिकांना यामध्ये यश मिळालं आहे. बाहेर काढून ठेवलं आहे म्हणजे त्या विषाणू, जंतूला जिवंत ठेवण्यासाठी त्याला खाऊ घालून त्यांची संख्या वाढवणे. यामुळे आपल्याला तो विषाणू कोण आहे, काय आहे त्याचं परीक्षण करत सविस्तर अभ्यास करता येतो. व्हायरस आयसोलेट केल्याने त्याच्याविरोधात कोणतं औषध गुणकारक ठरु शकतं याचा अभ्यास करु शकतो. विषाणू आयसोलेट केल्याचा पहिला फायदा म्हणजे त्याच्याविरोधात कोणती उपचारपद्दती अवलंबली पाहिजे हे कळण्यात मदत होते. त्यानुसार त्या विषाणूंवर औषधांचा वापर करु शकतो. तसंच लस शोधण्यासाठी खूप मोठी मदत मिळत यश मिळण्याची संधी असते,” असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं आहे.