“राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक”, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची दिलासादायक माहिती
!["Chief Minister is positive about reducing restrictions in the state", heartening information of Health Minister Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Rajesh_tope_uddhav_thackeray.jpg)
मुंबई |
सध्या राज्यभरात करोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधीपर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्याव असं आवाहन देखील टोपे यांनी केलंय. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली. राज्यातील करोना रुग्णसंख्येत बरीच घट झाली आहे, तसेच दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होत आहे, त्यामुळे येत्या काळात निर्बंध हटवले जाण्याची शक्यता आहे.
- राज्यातील करोना परिस्थिती –
राज्यात दैनंदिन करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होऊन सुमारे ५२ हजार झाली आहे. राज्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाली. जानेवारीमध्ये दैनंदिन सुमारे ३३ हजार ५१० रुग्ण आढळत होते, तर फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण ११ हजार ८९२ रुग्ण आढळले आहेत. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. १ फेब्रुवारीला राज्यात सुमारे १ लाख ९१ हजार रुग्ण उपचाराधीन होते, तर १२ फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी हे प्रमाण सुमारे ५२ हजारांपर्यंत घटले आहे. राज्यात सध्या सर्वाधिक १४ हजार ४६१ रुग्ण पुण्यात उपचाराधीन आहेत. त्या खालोखाल नागपूर, नगर, मुंबई, औरंगाबाद आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे ६० टक्के उपचाराधीन रुग्ण या जिल्ह्यांमध्ये आहेत.