‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
![Aims to complete vaccination of all in the state by this date; Information given by Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/ajit-pawar-7.jpg)
कोल्हापूर |
केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लस लोकांना देण्यात येत आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी लसींच्या उत्पादनात वाढ केली आहे. त्यामुळे लसींचे डोस अधिक प्रमाणात उपलब्ध होतील. यातून ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील १८ वर्षांपर्यंतच्या सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात दिली आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात तसेच महात्मा फुले योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहे. खाजगी रुग्णालयातही बिल आकारणी बाबत दरनिश्चिती करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी बिल आकारले पाहिजे अशा सक्त सूचनाही अजित पवार यांनी दिल्यात.
- कोल्हापूरला दिलासा नाहीच
कोल्हापूर जिल्ह्यात व्यवसाय, व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली द्यावी, या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास सवलत दिली जाणार का?, या प्रश्नावर अजित पवार यांनी करोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी सद्यस्थितीत निर्बंध अजिबात मागे घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. करोना नियमावलीचे पालन करणार नाही त्यांच्यावर अधिक कडकपणे कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलिसांना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर यादी दिली आहे. मुंबईत गेल्यानंतर हे प्रश्न मार्गी लावण्यात येईल. शासकीय कर्मचारी भरतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाणार असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न आहे. याबाबत न्यायालयीन गुंता निर्माण झालेला आहे. आरक्षणाबाबत केंद्र शासनाने पावले टाकण्याची गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे, असेही पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.