पारनेर तालुक्यातील ४३ गावांमध्ये ११ दिवस टाळेबंदी
- प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पारनेर |
वेगाने होणारा करोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी तालुक्यातील ४३ गावांमध्ये ११ दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार नीलेश लंके,पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ जुलैपासून १० ऑगस्टपर्यंत ११ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता ४३ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत वैद्यकीय व कृषी संबंधित सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
टाळेबंदी लागू करण्यात आलेल्या गावांमध्ये पारनेर शहरासह, सुपे, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, निघोज, जवळे,वडझिरे, देवीभोयरे, रांजणगाव मशीद या प्रमुख गावांसह ४३ गावांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी तालुक्यातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,तहसीलदार ज्योती देवरे त्यांच्या समवेत होते. वनकुटे येथे जिल्हा परिषद, पंचायतसमिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली.आमदार नीलेश लंके यांच्याशी डॉ.भोसले यांनी भ्रमणध्वनीवर चर्चा केली.त्यानंतर पदाधिकारम्य़ांनी स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिली.
करोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. इतर गावांमध्ये तसेच तालुक्याबाहेर मोलमजुरीसाठी जाणाऱ्या मजुरांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी.भाजीपाला,फळे, दूध वाहतूक करणारम्य़ा वाहन चालकांसह गावातून इतरत्र वाहने घेऊ न जाणाऱ्या चालकांना गावात आल्यानंतर विलगीकरणात ठेवण्यात यावे.त्यासाठी शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिल्या. विवाह समारंभ, वाङ्निश्चय, वाढदिवस, उदघाटने, राजकीय कार्यक्रम, दशक्रिया विधी अश्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे करोना संसर्गाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा समारंभासाठी नियमापेक्षा जास्त उपस्थिती असल्यास तसेच कोविड सुसंगत उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करुन संबंधित कार्यालये संसर्ग संपेपर्यंत कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी या वेळी दिले. करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह विविध व्यावसायिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे.करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने (अस्थापना) कायमस्वरूपी बंद करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिला आहे.
करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पारनेर तालुक्यातील नागरिकांनी,व्यावसायिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे तालुक्यात संसर्ग आटोक्यात होता.आता पारनेर तालुका संसर्गाचा ‘हॉट स्पॉट’ ठरला असला तरी नागरिक,पदाधिकारी व प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नातून तालुक्यात संसर्ग निश्चितच आटोक्यात येईल.या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा आहेत.
– डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.