लिंबू पाणी पिण्याचे हे बहुमूल्य फायदे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/428755456-H-1024x700-1.jpg)
आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो. नैसर्गिक स्वरुपात शरीर डिटॉक्स करण्यासाठी तज्ज्ञमंडळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. बहुतांश जणांना वेगवेगळ्या स्वरुपात लिंबू खाणं पसंत असते. लिंबूमुळे कोशिंबीर, खिचडी इत्यादी पाककृतींची चव वाढण्यास मदत मिळते.
आरोग्याबाबत सांगायचे झाले तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवल्यानंतर नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिंबू रस मिक्स करून चाटण तयार करून दिलं जातं. आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या घटकांचा लिंबूमध्ये समावेश आहे. लिंबूच्या सेवनामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळू शकतात हे जाणून घेऊया.
आपल्यापैकी बहुतांश जण पचनाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त असतात. पण जी लोक नियमित कोमट पाण्यातून लिंबाच्या रसाचे सेवन करतात, त्यांना अशा समस्यांचा सामना करावा लागत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लिंबू पाणी पिऊन तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता. या पेयामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. तुम्हाला केवळ लिंबू पाणी पिण्यास त्रास होत असल्यास त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करू शकता. यामुळे पेयाची चव देखील वाढेल आणि तुमची पचन प्रक्रिया देखील सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/9-Amazing-Health-Benefits-Of-Lemon-Water-During-Breastfeeding-1-910x1024.jpg)
सर्दी- खोकल्यापासून होतो बचाव
कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायल्यास तुम्हाला आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित स्वरुपात हे पेय प्यायल्यास सर्दी, खोकला यासारख्या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळेल. कारण लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अॅसिडचा समावेश असतो. हे घटक आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
मूतखड्याची समस्या दूर होण्यास मदत होते
डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार नियमित सकाळी दोन लिंबांचा रस कोमट पाण्यामध्ये मिक्स करून प्यायल्यास मूतखड्याची समस्या निर्माण होत नाही. कारण लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते. यातील पोषण तत्त्व शरीरामध्ये मूतखड्याची समस्या वाढू देत नाही. मूतखड्याचा त्रास रोखण्यासाठी लिंबाचा रस हा प्रभावी उपाय असल्याचे म्हटलं जाते. कारण यातील औषधी गुणधर्म शरीरात मूतखड्याच्या पेशींचा प्रादुर्भाव वाढण्याची संधीच देत नाही.
तोंड कोरडे होण्याची समस्या दूर होण्यास मदत
शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तोंड वारंवार कोरडे होण्याची समस्या उद्भवते. यामुळे सतत तहान लागणे आणि लघवीला होणे, यासारख्या त्रासाचाही सामना करावा लागतो. या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणजे लिंबू. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही फळे, भाज्या इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये लिंबू पिळून त्याचे सेवन करू शकता. आहारतज्ज्ञांनी सांगितल्यानंतरच सकाळच्या सुमारास लिंबू पाणी प्यावे. मोड आलेल्या कडधान्यांमध्येही तुम्ही लिंबू रस मिक्स करू शकता. यामुळे डिहायड्रेशन आणि तोंड कोरडे होण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
निरोगी आरोग्यासाठी फार उपयुक्त
वेळी अवेळी खाणेपिणे, बदलती जीवनशैली, अपुरी झोप इत्यादी कारणांमुळे काही जणांच्या शरीरातील अनावश्यक घटक, अतिरिक्त चरबी आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जाण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे अन्य आजारांना आयते निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. या समस्या टाळण्यासाठी आपल्या आहारामध्ये लिंबू किंवा लिंबू पाण्याचा समावेश करावा.