TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

शहराच्या गौरव गीताचा महापालिका प्रशासनाला विसर

नागपूर : महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडून घेण्यात आलेल्या गीत लेखन स्पर्धेतून प्रथम आलेल्या आणि नागपूर शहराचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व परंपरेचा इतिहास सांगणाऱ्या गौरव गीतांचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक गायक, वादक व गीतकारांनी अतिशय मेहनतीने तयार केलेल्या एका चांगल्या स्फूर्तिदायक गीतावर महापालिका प्रशासन अन्याय करत आहे.

तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार शहराच्या गौरव गीतासाठी जानेवारी महिन्यात महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडून गीत लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कारही जाहीर करण्यात आला होता. देवेंद्र दोडके यांच्या संकल्पनेतून शैलैश दाणी यांचे शब्द तसेच संगीतबद्ध केलेले गीत शहराचे गौरव गीत ठरले. या गीताला महापालिकेतर्फे ३१ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. ‘भारतभूच्या हृदयामधुनी, उफाळून ये ज्याची कहाणी, त्या नगरीचे वर्णन करुया, सुरात मिसळून सूर… नागपूर.. नागपूर… नागपूर…’ हे गीत होते. या गीताला तत्कालीन महापौरांनी शहराचे गौरव गीत म्हणून जाहीर केले.

हे गीत शहराचे ‘ॲथंम साँग’ व्हावे ही संकल्पना घेऊन तत्कालीन नगरसेवक ॲड. निशांत गांधी यांनी महापौरांची भेट घेतली होती. महापौरांनी त्यानंतर शहरातील प्रत्येक कार्यक्रमात हे गीत वाजवले जावे असे निर्देश दिले. मात्र, महापालिकेचा कार्यकाळ संपला आणि प्रशासनाकडून गेल्या सात महिन्यांत या गीताचा कुठेही प्रचार, प्रसार करण्यात आला नाही. शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सारंग जोशी आणि पुनीत कुशवाह यांनी गायले आहे.

शहराचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक परंपरा, विकास असा आशय असलेले गीत अतिशय छान पद्धतीने शब्दबद्ध आणि स्वरबद्ध करुन त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून अजुनही त्याचा प्रचार, प्रसार करण्यात आला नाही. शहरातील वेगवेगळ्या कार्यक्रमात आणि चौकाचौकात हे गीत वाजवले पाहिजे.

– निशांत गांधीमाजी नगरसेवक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button