राष्ट्रीय पुरस्कार विजेती आकांक्षा पिंगळेचे बारावीच्या परिक्षेत मोठं यश
यंदाच्या निकालातही मुलींची बाजी
![National Award, winner, Akanksha Pingale, 12th, in exams, big success, Girls' bet,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/sumi-780x470.jpg)
मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आलाय. ‘मंडळाकडून परीक्षा संपल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालातही मुलींना बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. तसंच राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार आकांक्षा पिंगळे हिनं देखील बारावीच्या परिक्षेत मोठं यश मिळवलं आहे.
पहिल्याच चित्रपटात सर्वोत्कृष्ट बालकलावंतांचा सन्मान मिळवणाऱ्या सुमीनं अर्थात बालकलाकार आकांक्षा पिंगळे हिनं बारावीच्या परिक्षेक तब्बल८६.५० टक्के इतके गुण मिळवले आहेत. या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
खरं तर सिनेसृष्टीत एखादा बालकलाकार हिट झाला की, त्याचं अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं. पण आकांक्षानं तसं होऊ दिलं नाही. तिनं राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं आणि यातही मोठं यश मिळवलं.
२०२२मध्ये सुमी या बालचित्रपटासाठी आकांक्षाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुमी फेम आकांक्षा पिंगळे ही पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर इथं वास्तव्यास असून तिचे वडील लक्ष्मण पिंपळे हे एका कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. मुलीला मिळालेल्या यशानं पिंगळे कुटुंब हरखून गेलं आहे.
खऱ्या आयुष्यातही सुमीची बाजी
‘सुमी’ या सिनेमात गरिब कुटुंबातल्या मुलीचा म्हणजेच सुमीचा सातवीनंतरच्या शिक्षणासाठीचा संघर्ष दाखवण्यात आलाय. गावात सातवीनंतर शाळा नाही, दूरच्या शाळेत जाण्यासाठी सायकल घेण्यासाठीही पालकांना मोठा संघर्ष करायला लागतोय..पण तिची जिद्द मात्र कमी होत नाही…असं सगळं या सिनेमात आहे. सिनेमाप्रमाणे खऱ्या आयुष्यात सुमी जिद्दीनं चांगल्या मार्कांनी पास झाली आहे.
मुलींचीच बाजी
दरम्यान, यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागलाय. बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९७.५१ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर पुण्याचा निकाल ९४.४४ टक्के इतका आहे.