रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे
मुंबई – महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होताच अनेक आरोप-प्रत्यारोप आणि टीकेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यातच, आजचा अर्थसंकल्प सर्व घटकांना दिलासा देणारा होता असं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात देखील सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीची घोषणा देखील केली आहे.
या अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि आलं किती? याची आकडेवारी सर्वांना माहिती आहे. अशा स्थितीत सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारनं मांडला आहे, असं ते म्हणाले.