अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी ७० तरुण महाराष्ट्रात, मुंबई पोलीसांचा मोठा खुलासा
Salman Khan | अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बिश्नोई गँगने सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याचा कट रचला होता. सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बिश्नोई गँगचे अनेक लोक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानच्या कारवर पनवेलमध्ये हल्ला करण्याची योजना लॉरेन्स बिश्नोई गँगने आखली होती. बिश्नोईचा मोठा भाऊ अनमोल आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार या दोघांनी पाकिस्तानच्या एका बेकायदा शस्त्र विक्रेत्याकडून एके ४७, एम १६ यांच्यासह अत्याधुनिक बंदुका खरेदी केल्या होत्या आणि त्या महाराष्ट्रात पाठवून त्याच्या कारवर हल्ला करून त्याला ठार करण्याची योजना आखण्यात आली होती.
हेही वाचा – इलेक्शन संपले..टोलचे दर वाढविले! मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू
लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहरा यांच्या टोळीतील सुमारे ६० ते ७० तरूण मुंबई, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि गुजरातमधून आले असून ते सलमान खानवर लक्ष ठेवून आहेत. सलमान खानवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्याची लॉरेन्स गँगची योजना होती. याशिवाय हल्ला केल्यानंतर आरोपींनी कन्याकुमारीहून बोटीने श्रीलंकेला पळून जाण्याची योजना आखली होती.
दरम्यान, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचा आणि अटक झालेल्या आरोपींचा काहीही संबंध नाही. अटक करण्यात आलेले चौघे पनवेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. त्यांच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार होण्यापूर्वीही ते दोघे वेगळे राहत होते.