28 मार्चपासून दूरदर्शनवर रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण,केंद्र सरकारचा निर्णय
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. घराबाहेर पडण्यावर बंधन असल्यानं लोकांना घरात बसूनही काय कराव असा प्रश्न आहे…मात्र आता यावर केंद्र सराकरनं एक मस्त उपाय शोधून काढला आहे… घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहितीही दिली.
रामायण मालिकेचा पहिला भाग शनिवारी सकाळी ९ वाजता आणि दुसरा भाग रात्री ९ वाजता दाखविण्यात येणार आहे…९० च्या दशकात रामायण ही मालिका दूरचित्रवाहिनीवर खूप गाजली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेला तेव्हा संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी दर रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित व्हायची.
काही दिवसांपू्र्वीच या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार सोनी टीव्हीवरच्या द कपिल शर्मा शोमध्ये आले होते. तेव्हापासूनच ही मालिका परत दूरदर्शनवर दाखवावी, अशी मागणी पुढे आली होती. ती आता पूर्ण झाली आहे.