‘श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नाही तर हत्या’, केरळच्या पोलीस अधिकाऱ्याचा दावा
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला एका वर्षाहून जास्त काळ झाला आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत बाथ टबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दुबईत मृतदेह मिळण्यात झालेला उशीर यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. अनेकांना आता श्रीदेवी यांच्या मृत्यूचा विसर पडला आहे. मात्र केरळचे पोलीस महासंचालक (कारागृह) ऋषीराज सिंह यांनी शंका उपस्थित केली आहे. केरळमधील एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी बुडाल्याने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला नसावा असं म्हटलं आहे.
सिंह यांनी फॉरेन्सिक एक्स्पर्ट असणाऱ्या आपल्या एका मित्राशी झालेल्या चर्चेच्या आधारे हा दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे सिंह यांचा तो मित्र सध्या जिवंत नाही आहे. यामुळे हा दावा त्यांनी खरंच केला होता का हे कळू शकलेलं नाही.
“माझा मित्र आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट मित्र डॉ उमादथन याने मला श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नसून हत्या झाली असावी असं सांगितलं होतं. कुतुहूल असल्यानेच मी त्याला यासंबंधी विचारलं होतं”, असं सिंह यांनी लिहिलं आहे. “यावेळी त्याने म्हणणं पटवून देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यानुसार, एक फूट पाण्यात कोणीही बुडू शकत नाही. मग ती व्यक्ती कितीही मद्यपान करत असली तरी. फक्त जर कोणी त्या व्यक्तीचे दोन्ही पाय पकडले आणि तोंड पकडून ठेवलं तरच बुडू शकतो”, असंही सिंह यांनी सांगितलं आहे.
श्रीदेवा यांच्या निधनानंतर अनेकांनी वेगवेगळे मुद्दे मांडले होते. अनेकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा केला होता. सुब्रहमण्यम स्वामी यांनीही श्रीदेवी यांना जास्त मद्यपानाची सवय नव्हती असं म्हटलं होतं. श्रीदेवी लग्नासाठी दुबईत असताना त्यांचं निधन झालं होतं. यावेळी शवविच्छेदन अहवालानंतर तेथील अधिकाऱ्यांनी बुडाल्यानेच श्रीदेवी यांचं निधन झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर चर्चा बंद होणं अपेक्षित होतं. पण अद्यापही चर्चा सुरु असून लोक आपापले अंदाज व्यक्त करत आहेत.