लॉकडाऊनमुळे ‘राधाकृष्ण’ मालिकेची संपूर्ण टीम सेटवरच अडकली
प्रसिद्ध टीव्ही मालिका राधाकृष्णची संपूर्ण टीम ही लॉकडाऊनमुळे उमरगावमधील त्यांच्या सेटवरच अडकली आहे. मालिकेच्या सर्व कलाकारांसोबत क्र्यू मेंबरदेखील महिन्याभरापासून उमरगावमधल्या सेटवरच आहेत. मालिकेसाठी काम करणाऱ्या जवळपास १८० लोकांचा यात समावेश आहे.
दरवेळी माझ्यासोबत माझी आई चित्रीकरणासाठी असते, काही दिवसांत लॉकडाऊन संपेल असं आम्हाला वाटलं, त्यावेळी सुरक्षेसाठी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबण्याचं आवाहन आम्हाला करण्यात आलं त्यामुळे आम्ही इथेच सेटवर थांबलो मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानं आम्हाला आता मुंबईत परतता येत नाहीये, अशी माहिती अभिनेत्री मलिका सिंग हिनं दिली.
सेटवर दररोज डॉक्टर आमच्या तपासणीसाठी येतात, तसेच संपूर्ण सेट हा दररोज सॅनिटाइझ केला जातो अशीही माहिती मलिकानं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.
तर अभिनेता सुमेध मुदगलकरही आपल्या कुटुंबापासून दूर आहे. सर्वच कलाकार या काळात घरी आपल्या कुटुंबासोबत आहे, मी मुळचा पुण्याचा आहे मात्र मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला कुटुंबीयांसोबत वेळ कधीच व्यतीत करायला मिळत नाही, आता तर आम्ही एक महिन्यांपासून इथेच आहोत, असं त्यानं सांगितलं. या काळात आम्ही एकमेकांची काळजी घेत आहोत असंही सुमेध म्हणाला.