‘भारत’ची २५० कोटींची कमाई, कतरिनाने साजरा केला आनंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/salman-katrina.jpg)
सलमान खान, कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘भारत’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा बहुचर्चित चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. देशात ‘भारत’ची कमाई १५० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे तर जगभरात या चित्रपटाने कमाईचा २५० कोटींचा टप्पा गाठला आहे.
कतरिना कैफ व अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. ‘जगभरात चित्रपटाने २५० कोटी रुपयांची कमाई केली असून हा आकडा अजूनही वाढणार आहे,’ असं ट्विट अतुल अग्निहोत्रीने केलं आहे. कतरिनानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सलमानचा फोटो ठेवला आहे.
‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे.