अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघांना तिहेरी जन्मठेप
मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांना मुंबई सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेप सुनावली असून ही शिक्षा एकत्रच भोगायची आहे.
अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन यांनी अतिशय थंड डोक्याने 2012 मध्ये मीनाक्षीची निर्घृण हत्या केली होती. मीनाक्षीच्या देहाची ओळख पटू नये यासाठी दोघांनी तिचे डोके धडापासून वेगळे केले. त्यानंतर तिचे धड आणि शीर दोन वेगळवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले.
मीनाक्षी थापा हत्याकांडप्रकरणी अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी अपहरण, खंडणी आणि हत्या या प्रकरणी मीनाक्षीच्या मारेकऱ्यांना तिहेरी जन्मठेप सुनावली आहे. पैशाच्या हव्यासापोटी अमित आणि प्रीती यांनी हत्या केली होती. सुरुवातीपासूनच या दोघांनी मीनाक्षीची हत्या करण्याचं ठरवलं होतं, त्यामुळे या दोघांना फाशीपेक्षा कमी शिक्षा होऊ नये अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केली होती.