‘..पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात’; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
खूप लोकांनी आम्हाला त्रास दिलाय, त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ
मुंबई : धुलिवंदनाच्या निमित्ताने जनसामान्यांप्रमाणेच राजकीय नेतेमंडळीही आज धुळवडीचा आनंद घेत आहेत. नेत्याच्या घरी, कार्यालयांमध्ये धुलिवंदन मोठ्या जल्लोषात साजरं केलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवासोबत धुलिवंदन साजरं केलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयात धुलिवंदन साजरं केलं.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्या प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी ही होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगला असेल. सगळ्यांना त्यांचे रंग त्यात पाहायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल.
आम्ही विधानसभेत सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिलाय. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनेक वेळा होळीला आमच्या काही मित्रांना खोटं सांगून. भांग वगैरे पाजून दिली. त्यानंतर दिवसभर त्यांचं जे काही चाललं होतं, कुणी गाणं म्हणत होतं. कुणी रडत होतं. हे सगळं पाहून मजा आली. पण असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा, अशा शब्दात फडणवीसांनी टोलेबाजी केली.
मला एक-दोन लोकांनाच सल्ला द्यायचाय की उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा करण्याची पद्धच आहे. पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. मला त्यांना सांगायचं आहे की एखादा दिवस ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.