#Covid-19: करोनाच्या पहिल्या लाटेचा विक्रम मोडला; महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांक
पुणे |
महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. करोना संकट गडद झाल्याची जाणीव काल (१९ मार्च) सायंकाळी आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली. करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात पहिली लाट असताना म्हणजेच १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा विक्रम गुरूवारी मोडीत निघाला आहे. राज्यात फेब्रवारीपासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. सुरूवातीला दिवसाला ४ ते ५ हजाराच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत रुग्णसंख्या दहा हजारांच्या काठावर पोहचली. तर मार्च मध्यापर्यंत महाराष्ट्रात २० ते २४ हजारांच्या सरासरीने दररोज रुग्ण आढळून येत आहे.
गुरुवारी झोप उडवणारी आकडेवारी समोर आली. राज्यात २५ हजार ८३३ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात पहिली लाट आली, तेव्हा सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. या पूर्वी सर्वाधिक रुग्ण १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ नोंदविले होते. चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याखालोखाल मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादला एक हजार २७४, पिंपरी-चिंचवड १२७२ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे.
वाचा- वाझे प्रकरण सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड; संजय निरुपमांचा गंभीर आरोप