breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे!- नाना पटोले

  • सुप्रीम कोर्टाने टास्कफोर्स स्थापन करून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले.

मुंबई |

केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसुत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईतील अ-९ या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते परंतु मोदी सरकारने हा आत्माच संपवण्याचे काम सुरु केले आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करुन कोर्टाने कोविडमध्ये हस्तक्षेप करु नये, कोर्ट या विषयातील तज्ञ नाही असे म्हणत कोर्टाचा अवमान केला आहे. नोटाबंदी जाहीर करताना नरेंद्र मोदींनी कोणत्या अर्थतज्ञांचा सल्ला घेतला होता का? नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आहेत का ? तसे नसतानाही नोटंबदी जाहीर करुन लोकांना वेठीस धरले. सुप्रीम कोर्टात यापूर्वी कोलगेट, टू जी प्रकरण आले होते त्यावेळच्या युपीए सरकारने कोर्टाला अशा प्रकारे हस्तक्षेप करु नका असे म्हटले नव्हते. सुप्रीम कोर्टाने देशातील कोवीडची विदारक परिस्थिती पाहूनच टास्क फोर्स स्थापन केला आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जिवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आकलन करुन मोदी सरकारने नियोजन केले नाही त्यामुळे हजारो लोक ऑक्सीजन, योग्य आरोग्य उपकरणे, पुरेशा लसींअभावी लोक मरत आहेत. शेकडो मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने क्रूरपणे दफन केली जात आहेत तर शेकडो नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत. लस नाही, औषध नाही, ऑक्सीजन नाही, पीएम केअरमधून पुरवलेली उपकरणेही दुय्यम दर्जाची आहेत. मोदींचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली आहे. कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे. भारत पहिल्यांदाच राष्ट्रीय महामारीचा मुकाबला करत नाही. यापूर्वी आलेल्या गोवर, देवी तसेच पोलीओचा मुकाबला भारताने समर्थपणे केला आहे. २० कोटी बालकांचे पोलीओ लसीकरण केले त्यावेळी पोर्टल, ऍप, ओटीपी असे काही नव्हते तरीही ठोस धोरण आखून तत्कालीन काँग्रेस सरकारने पोलीओचे समूळ उच्चाटन करुन दाखवले, ती धमक मोदी सरकारमध्ये दिसत नाही.

काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी, राहुलजी यांनी कोरोना संकटाच्या गंभीर परिणामाचा इशारा मोदी सरकारला दिला होता. वेळीच त्यांचा सल्ला ऐकून कार्यवाही केली असती तर देशाला आजच्यासारख्या विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. केवळ सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपाचे नेते हे सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांची खिल्ली उडवण्यात तसेच भाजपाच्या आयटी सेलकडून ट्रोल करण्यातच वेळ घालवला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सोनियाजी व राहुलजी यांच्याबद्दलचे कालचे वक्तव्य हे सुद्धा त्यांच्या विकृत मानसिकतेतूनच तसेच सत्तेच्या मस्तवालपणातून आले आहे. विरोधकांनी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी केली असती तर आज दिसत असलेले भयनाक दृश्य पहावे लागले नसते. हजारो-लाखो जीव वाचले असते तसेच भारताची जगात एवढी नाचक्की झाली नसती, असेही पटोले म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे. डॉ सुधीर ढोणे, डॉ. संजय लाखे पाटील, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

वाचा- #Covid-19: केंद्रानं लसीकरणाचं ओझं टाकलं राज्यांच्या खांद्यावर, ३५ हजार कोटींचं काय झालं; आमदार रोहित पवारांचा सवाल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button