CAA Protest : हिंसाचाराचे सहा बळी; निदर्शकांची दगडफेक, जाळपोळ; ५० पोलीस जखमी
नवी दिल्ली | महाईन्यूज
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शुक्रवारी दिल्लीसह उत्तर प्रदेशात जनक्षोभाचा भडका उडाला. दिल्लीत वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तर उत्तर प्रदेशातील हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू आणि सुमारे ५० पोलीस जखमी झाले.बिजनोरमध्ये दोन, तर संभल, फिरोजाबाद, मेरठ आणि कानपूरमध्ये प्रत्येकी एका निदर्शकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिंसक जमावाला नियंत्रित करण्यासाठी आम्ही एकही गोळी झाडली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशातील १३ जिल्ह्य़ांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर निदर्शने करण्यात आली होती. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशांना धुडकावून हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. निदर्शकांनी अनेक शहरांमध्ये दगडफेक केली. वाहनांना आग लावली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला.दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व शुक्रवारी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केले. पोलिसांना चुकवत आझाद जामा मशिदीच्या पायऱ्यांवर उभे राहिले. त्यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत मोदी-शहांना आव्हान दिले. पोलिसांनी आझाद यांना ताब्यातही घेतले; पण ते पोलिसांच्या तावडीतून निसटले आहेत.
लाल किल्ल्यासमोर गुरुवारी रात्री आंदोलन करू पाहणाऱ्या जमावाला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले होते; परंतु लालकिल्ल्यासमोर असलेल्या जामा मशिदीच्या आवारात शुक्रवारी सकाळपासून गर्दी जमू लागलेली होती. अनेकांच्या हातात तिरंगा, डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा आणि संविधानाच्या प्रती होत्या. जंतरमंतरप्रमाणे इथेही लोक पोलिसांना गुलाबपुष्प देऊ न शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत होते. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा दिल्ली पोलीस शहरभर शोध घेत होते व तेवढय़ात आझाद यांनी ट्वीट करून मला अटक झालेली नाही, मी जामा मशिदीत येत असल्याचा संदेश दिला होता. आझाद दुपारी जामा मशिदीच्या पायऱ्यांवर दिसताच निदर्शकांनी घोषणा दिल्या. त्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. पोलिसांनी आझाद यांना मशिदीच्या बाहेर येण्याचे आवाहन केले. आझाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, पण ते पोलिसांच्या ताब्यातून निसटले.