YES बँकेच्या खातेदारांना चिंता नको, प्रत्येक ठेवीदारांची बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित- निर्मला सीतारामन
YES बँकेच्या खातेदारांनी चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. प्रत्येक ठेवीदारांची बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. गुरुवारी रात्री रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले. सध्या या बँकेच्या खातेदारांना केवळ 50 हजार रुपयेच काढता येताहेत. त्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, येस बँकेसंदर्भातील सर्व घडामोडींवर आमचे लक्ष आहे. आता रिझर्व्ह बँकेने या संदर्भात एक आराखडा तयार केला आहे. या प्रकरणी लवकरच मार्ग शोधण्यात येईल. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे दोन्हीही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच ठेवीदारांनी काळजी करण्याचे कारण नाही. त्यांचे पैसे सुरक्षित आहेत.
सर्व ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या येस बँकेतून ५० हजार रुपयेच काढता येत असले तरी कोणत्या खातेदाराला अधिक रक्कम हवी असेल तर त्याने मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली मागणी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, येस बँकेसंदर्भात लवकरच तोडगा काढला जाईल. यासाठी 30 दिवसांची मुदत ही जास्तीत जास्त आहे. पण त्याआधीच निर्णय घेतला जाईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सकाळी सांगितले.