20 एप्रिलपासून देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली पुन्हा सुरू ?
येत्या सोमवार पासून म्हणजे , २० एप्रिलपासून देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी २५ मार्चला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली तात्पुरती बंद करण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे सर्व राज्यांना मिळाव्यात, यासाठी त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता.
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व ट्रक चालकांना राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक कऱण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने गृह मंत्रालयाच्या आदेशांचे पालन करण गरजेच आहे तसेच टोल वसुली २० एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात यावी असंही या पत्रात म्हटलं आहे…
टोलवसुलीतून सरकारला महसूल मिळत असल्याचा मुद्दा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आधीच सरकारकडे मांडला आहे. त्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे संघटनेने म्हटले आहे.