सुपारी बागायतदार चिंतेत; अतिपावसाने सलग दुसऱ्या वर्षीही सुपारीची गळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/unnamed-1.jpg)
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सुपारी बागायतीसह जिल्हाभर सुपारीला गळ लागली आहे त्यामुळे मशागत करून बागायतीमध्ये आर्थिक गुंतवणूक करणारे बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. अतिपावसाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी सुपारीची गळ झाली आहे.
झोळंबे, तळकट, कोलझर, असनिये, तांबोळी भागात तर अनेक बागायतदारांचे जवळपास ६० टक्के उत्पन्नच या गळ रोगामुळे उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे कित्येक कुटुंबांचे वर्षभराचे पूण अर्थकारणच कोलमडून गेले आहे. जिल्हाभरातील सुपारी बागायतींमध्ये कमी जास्त प्रमाणात हे चित्र उभे राहिले आहे.
दोडामार्ग तालुक्याच्या अर्थकारणात सुपारीचे महत्त्व खूप मोठे आहे. इथे शेकडो एकरवर सुपारीच्या बागा आहेत. यावर कित्येक कुटुंबांचा चरीतार्थ चालतो; मात्र अलिकडे वातावरणातील बदलाचा या पिकाला खूप मोठा फटका बसत आहे. गेली दोन वर्षे याची तीव्रता खूपच वाढली आहे. याची तीव्रता समजून घेण्यासाठी सुपारीचे अर्थकारण लक्षात घ्यायला हवे. असे बागायतदार शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
या भागात नारळ आणि सुपारीच्या बागा आहेत. यापैकी नारळ माकड, शेकरू व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बेभरवशाचा बनला आहे. अशावेळी सुपारीच बागायतदारांना आर्थिक आधार देते. या झाडाला देखभाल खर्च मोठा आहे. याला नियमित पाणी, मशागत आवश्यक असते. ठरावीक कालावधीनंतर पुर्नलागवड करावी लागते. शिवाय अलिकडे फवारणीचा खर्चही वाढला आहे. इतके करून पावसाळ्यात याचे पीक येते. नेमकी याच काळात अतिवृष्टी झाल्यास बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होवून मोठय़ा प्रमाणात गळ होते. असे झाल्यास देखभाल खर्च वाया जातोच, शिवाय येणाऱ्या काळात पुन्हा बागेचे व्यवस्थापन आणि कुटुंबांचे अर्थकारण चालवणे क ठीण बनते. सलग दोन वर्षे या चक्रव्यूहात सापडले आहेत.
गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीची शासनाने तुटपुंजी भरपाई दिली. अनेकांना ती मिळालीच नाही; मात्र यंदातरी स्थिती सुधारेल म्हणून बागायतदारांनी पदरमोड तसेच उदारीवर पैसे घेत बागेची देखभाल केली. फवारणीही करण्यात आली; मात्र यंदा सुद्धा सलग पाऊ स झाल्याने सुपारीची खूप मोठी गळ झाली आहे. झाडाखाली अक्षरश: कोवळ्या सुपारीच्या फळांचा सडा पडला आहे. पक्व सुपारी मिळणार नसल्याने बागायतदारांचे अर्थकारण पूर्ण कोसळले आहे. अनेकांना पुढचे वर्षभर कसे काढायचे हा प्रश्न पडला आहे. हे नुकसान लाखोंच्या घरात आहे. अजुनही ही गळ सुरूच आहे.
बागायतदार ही कोवळी फळे जमा करून आणत आहेत. अनेकांची घरे हा गळ साठवून भरली आहेत. या गळाला तुटपुंजा दर मिळतो; मात्र तो जमा करून व सोलून बाजारात नेण्यापर्यंतचे आणि त्याला मिळणाऱ्या कवडीमोल किंमतीचे अर्थकारण जुळत नाही. सतत दोन वर्षे झालेल्या या प्रकारामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. अनेकांनी नवी लागवड थांबवली आहे. यामुळे बागायतदार अधिक चिंतेत असल्याचे पहायला मिळाले आहे.