लॉकडाऊन संपल्यानंतर इंडिगो एअरलाईन्समध्ये मोठे बदल, प्रवाशांना विमानात कोणतेही अन्नपदार्थ दिले जाणार नाही
कोरोना विषाणूमुळे सगळ्याच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे…. याचंच एक उदाहरण इंडिगो एअरलाईन्सकडून मिळालेल्या माहितीतून पुढे आले आहे. देशातील लॉकडाऊन संपल्यानंतर आणि विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर इंडिगोकडून आपल्या प्रवाशांना विमानात कोणतेही अन्नपदार्थ दिले जाणार नाही. त्याचबरोबर विमानसेवाही एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सुरू करण्यात येईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. २१ दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. येत्या १४ एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. पण कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाऊ शकतो किंवा टप्याटप्याने वेगवेगळ्या भागात लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो. या स्थितीत इंडिगो एअरलाईन्सकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक मेल लिहिले आहे. त्यामध्ये कंपनी सध्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देत आहे आणि नजीकच्या काळात काय महत्त्वाचे आहे याची माहिती देण्यात आली आहे.
या मेलमध्ये दत्ता यांनी म्हटले आहे की, विमानसेवा पुन्हा सुरू झाली की कशा पद्धतीने कामकाज सुरू करायचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण विमानाच्या अंतर्गत स्वच्छतेकडे अजून जास्त लक्ष देण्यात येईल. विमान सातत्याने निर्जंतूक करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर विमानात प्रवाशांना कोणतेही अन्नपदार्थ दिले जाणार नाहीत. अर्थात हा निर्णय अल्प काळासाठीच असेल. विमानातील एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवासी घेऊनच विमानसेवा चालविली जाईल. या संदर्भात आणखी नियम घेऊन लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत येऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.