पाकिस्तानमध्ये महागाईचा हाहाकार;खाद्यान्न मिळत नसल्याने नागरिक रडकुंडीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pakistan.1.787655.jpg)
आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसमोर आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे.पाकिस्तानमध्ये महागाईने हाहाकार घातला असून नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. खाद्यान्न मिळत नसल्याने नागरिक रडकुंडीला आले आहेत. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानमध्ये पीठाचा दर हा ७५ रुपये किलो इतका झाला आहे. एवढे पैसे मोजण्याची तयारी असूनदेखील सिंधसह अन्य काही राज्यांमध्ये गहू, पीठाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
वाढती महागाई, गहू आणि पीठाच्या टंचाई विरोधात आता विरोधी पक्षाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर इम्रान खान यांच्या सरकारने हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी आणि खाद्यान्न संकट दूर करण्यासाठी त्यांनी एका योजनेला मंजुरी दिली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरकारची कॅबिनेट बैठक महागाईच्या मुद्यावर आयोजित करण्यात आली होती. महागाईच्या संकटाला सिंध सरकार जबाबदार असल्याचा आरोप इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे. सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार आहे. सिंध प्रांतात ७५ रुपये किलो या दराने पीठाची विक्री होत आहे. तर, एक चपाती १५ रुपयांना विकली जात आहे. टोमॅटोच्या दरात ११७ टक्क्यांची दरवाढ झाली आहे. त्याशिवाय बटाटे ६४.८ टक्के, अंडी ४०.८ टक्के, साखर ३२ टक्के, पाव १९.४ टक्के, तूप १७.४ टक्के इतकी दरवाढ झाली आहे.
तीन दिवस धावपळ करूनही एका नागरिकाला पीठ मिळाले नाही. माध्यमांशी बोलताना या व्यक्तिच्या अश्रूंचा बांध फुटला. तीन दिवसांपासून उपाशी असल्याचे त्याने सांगितले. घरात पीठ नसल्यामुळे लहान मुले उपाशी असल्याचे त्याने सांगितले. एका चपातीची किंमत १४ रुपये झाली आहे. आम्ही गरिबांनी जायचे कुठे, पीठासाठी एवढे पैसे मोजावे लागत आहेत, औषधांचा खर्च कसा करायचा असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.