कोरोना नियंत्रणात आल्यानंतरही किमान 6 महिन्यांपर्यंत 40% लोक हवाई यात्रा करणार नाही
एअर इंडिया, स्पाइस जेट, गो एअर, एअर एशिया, इंडिगोसह जगभरातील सर्व विमान कंपन्यांसाठी वाईट बातमी आहे. लोकांना कोरोना विषाणूची इतकी भीती निर्माण झाली आहे की, पुढील सहा महिन्यांपर्यंत ४० टक्के लोकांना हवाई प्रवास करण्याची हिंमत होणार नाही. आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघटनेने (आयटा) सोमवारी जारी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. कोरोना विषाणूला घाबरलेल्या ४० टक्के लोकांनी हा विषाणू नियंत्रणात आल्यानंतरही किमान सहा महिन्यांपर्यंत हवाई यात्रा करणार नसल्याचं म्हटलं आहे.
आयटाने सोमवारी जारी केलेल्या सर्व्हेत भाग घेणाऱ्यांपैकी फक्त १४ टक्के लोकांनी हवाई प्रवासासाठी वाट पाहणार नसल्याचे म्हटले आहे. तर सुमारे ४६ टक्के लोकांनी एक किंवा दोन महिने वाट पाहिल्यानंतर हवाई प्रवास करु असे म्हटले आहे. उर्वरित ४० टक्के लोकांनी तर सहा किंवा त्याहून अधिक महिन्यानंतरच हवाई प्रवासाचा विचार करु असे म्हटले आहे.
याआधी हवाई प्रवास केलेल्या प्रवाशांदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. यातील ४ टक्के लोकांनी यापुढे हवाई प्रवास करणार नसल्याचे म्हटले आहे. ८ टक्के लोकांनी किमान एक वर्ष आणि २८ टक्के लोकांनी सहा महिन्यांपर्यंत हवाई प्रवास टाळणार असल्याचे म्हटले आहे. लोकांनी आर्थिक तंगीमुळे सध्या प्रवास करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. सर्व्हेत ६९ टक्के लोकांनी म्हटले की, जोपर्यंत त्यांची वैयक्तिक आर्थिक स्थितीत स्थिरता येत नाही तोपर्यंत हवाई प्रवास टाळणार आहे.