#Coronolockdown:’वंदे भारत मिशन’ला आजपासून सुरुवात, परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणणार!
मुंबई : परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे. ‘वंदे भारत मिशन’ असं या अभियानाचं नाव आहे. विमान आणि जहाजातून जवळपास 15 हजार भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणलं जाणार आहे. यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णत: सज्ज करण्यात आली आहेत. एअर इंडियाचं विमान आज अबूधाबीवरुन 200 भारतीयांना घेऊन येणार आहे. परराष्ट्रातून उड्डाण होण्याआधी सर्व प्रवाशांची मेडिकल स्क्रीनिंग होणार आहे.
दरम्यान, मायदेशी परतीच्या प्रवासासाठी या नागरिकांना काही मोबदलाही द्यावा लागणार आहे. लंडन ते मुंबई या प्रवासासाठी 50 हजार रुपये, तर शिकागो ते दिल्ली या प्रवासासाठी साधारणपणे 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
एकूण 64 विमानांपैकी 10 विमानं यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलिपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये उड्डाण करणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक बंद झाल्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात हे भारतीय अडकून पडले होते.
विमानतळावर तयारी पूर्ण
कोरोना व्हायरसमुळे देशभर लावलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या आगमनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. हवाई आणि समुद्रमार्गे होणाऱ्या या अभियानाची सुरुवात आजपासून (7 मे) होईल. टप्प्याटप्प्याने या भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकारने एक तपशीलवार प्लॅन आखला आहे. विमानं आणि नौदलाच्या जहाजातून या भारतीयांना देशात आणलं जाणार आहे. एअर इंडियाचं विमान 200 नागरिकांना घेऊन अबूधाबीवरुन उड्डाण करेल आणि केरळच्या कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. या अभियानाच्या पार्श्वभूमवर तिरुवनंतरपुरम, दिल्ली आणि मुंबईसह अनेक विमानतळावर आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था केली आहे.