सीतापुरात हल्लेखोर कुत्र्यांचा कहर…
सहा महिन्यात 12 मुलांना मारून खाल्ले
लखनौ ( उत्तर प्रदेश) – सीतापूरमध्ये हल्लेखोर कुत्र्यांची दहशत माजली आहे. गेल्या सहा महिन्यात या कुत्र्यांनी 12 मुलांवर हल्ला करून त्यांना मारून खाल्ले आहे. प्रशासन उपाययोजना करत असूनही लोक दहशतीच्या छायेत वावरत आहेत. बागा, शेते, सुनसान भाग आणि अगदी वस्तीतही हे कुत्रे माणसांवर, विशेषकरून मुलांवर हल्ले करत आहेत.
कुत्र्यांच्या अशा वागण्याचे विश्लेषण करताना पशुचिकित्सक गौतम यांचे असे म्हणणे आहे, की कुत्र्यांना पूर्वीसारखे त्यांच्या सवयीचे अन्न मिळत नसल्याने ते असे हल्लेखोर झाले आहेत.
पूर्वी या भागात अनेक खाटिकखाने होते. त्यातील उरलेसुरले आणि टाकाऊ मांस-हाडे कुत्र्यांना मिळत होते. खाटिकखाने बंद झाल्याने कुत्र्यांना मांस मिळेनासे झाले. त्यांची उपासमार होऊ लागली. परिणामी ते हल्लेखोर- शिकारी बनले आहेत. सीतापुरात तर त्यांचा त्रास सर्वाधिक आहे. कालच तालगाव येथे शेळ्या चारायला गेलेल्या 10 वर्षांच्या कासीमवर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कासीमचा मृत्यू झाला गेल्या आठवडाभरात कुत्र्यांनी घेतलेला हा सहावा बळी आहे.
नोव्हेंबरपासून कुत्र्यांच्या हल्ल्यात 12 मुले मरण पावली असल्याचे, आणि सहा गंभीर जखमी झाली असल्याचे जिल्हाधिकारी शीतल वर्मा यांनी सांगितले. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लखनौ आणि दिल्ली महापालिकांकडून मदत मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.