समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट: स्वामी असीमानंद यांच्यासहित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Swami-aseemanand.jpg)
समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासहित सर्व चार आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंचकुला येथील विशेष एनआयए न्यायालयाने स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. समझोता एक्सप्रेस ही भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. १८ फेब्रुवारी २००७ रोजी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात बहुसंख्य प्रवासी पाकिस्तानी नागरीक होते.
पाकिस्तानी मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या हेतूने बॉम्बस्फोट घडवण्यात आला असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. समझोता एक्सप्रेस पानिपत जवळील दिवानी गावामध्ये असताना हा बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी अटारीच्या दिशेने ही ट्रेन जात होती. या ट्रेनचे अटारी हे भारतातील शेवटचे स्थानक आहे.
अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथीय संघटनेचे सदस्य असीमानंद यांना या बॉम्बस्फोटात आरोपी बनवण्यात आले होते. लोकेश शर्मा, सुनील जोशी, संदीप डांगे आणि रामचंद्र कालासांग्रा याचे नाव सुद्धा आरोपत्रात होते. या स्फोटाचा मास्टरमाईंड सुनील जोशी २००७ साली मध्य प्रदेश देवास येथे मृतावस्थेत सापडला होता. मात्र न्यायालयाने आज असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली.
जाणून घ्या समझोता एक्सप्रेसचा इतिहास
समझोता एक्सप्रेस चालू होऊन आज ४० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. २२ जुलै १९७६ रोजी समझोता एक्सप्रेस सुरु झाली. सुरुवातीला अमृतसर ते लाहोर या ४२ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावायची. समझोता एक्सप्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. ८० च्या दशकात पंजाबमधील वातावरण बिघडू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेने अटारीमधून समझोता एक्सप्रेस बंद केली.
जेव्हा ही ट्रेन सुरु झाली तेव्हा दररोज या ट्रेनच्या फेऱ्या व्हायच्या. १९९४ पासून या ट्रेनच्या साप्ताहिक फेऱ्या सुरु झाल्या. पाकिस्तानात लाहोर आणि भारतात दिल्लीमध्ये या ट्रेनचा थांबा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केल्यानंतर २००२ ते २००४ अशी दोन वर्ष समझोता एक्सप्रेस बंद करण्यात आली होती.