शांघाय परिषदेला कॉंग्रेसचे शिष्टमंडळ रवाना
नवी दिल्ली – शांघाय कोऑपरेशन च्या राजकीय फोरमच्या परिषदेसाठी कॉंग्रेस पक्षाने आपले शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कॉंग्रेसच्या या सहा सदस्य शिष्टमंडळाचे नेतृत्व पक्षाचे राज्यसभेचे सदस्य आनंद शर्मा हे करीत असून हे शिष्टमंडळ चीनला आज रवाना झाले. दक्षिण चीन मधील शेनझेन शहरात हे संमेलन होणार आहे. या परिषदेत शांघाय कार्पोरेशनचे सदस्य असलेल्या चीन, भारत, रशिया, कझाकिस्तान, किरगीजस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान या देशांतील राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत.
पाकिस्तानलाही अलिकडेच या संघटनेचे सदस्य करून घेण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात मुकुल वासनिक, भूवनेश्वर कलिटा, एमएम पल्लम राजू, रजनी पाटील, के मुरलीधरन या नेत्यांचा समावेश आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने कॉंग्रेस पक्षाला हे निमंत्रण दिले आहे. राजकीय पक्षांची ही परिषद 28 मे पर्यंत चालणार आहे. चीनने सध्या खुलेपणाचे धोरण अवलंबले असून यात चीनच्या नवीन राजकीय भूमिकेचीही मांडणी केली जाणार आहे. या भेटीच्या निमीत्ताने कॉंग्रेसचे शिष्टमंडळ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करणार आहे.