विहिरीत आढळले पाच भावांचे मृतदेह, आई-वडील पसार
मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बडवानी जिल्ह्यातील चिखली गावातील एका विहिरीत पाच चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. एकाच कुटुंबातील हे सर्वजण आहेत. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर मुलांचे आई-वडील पसार झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बडवानी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ओमकार सिंह कलेश म्हणाले की, पाचही मुलांचे मृतदेह बुधवारी सकाळी सेंधवा ग्रामीण ठाण्याच्या चिखली गावातील विहिरीत आढळून आले. सर्व मुलांचे वय हे तीन ते सात वर्षे वयोगटातील आहे. एका ग्रामस्थाने पहिल्यांदा या मुलांचे मृतदेह पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढले.
चिखली गावातील रहिवासी भरत सिंह (वय ४०) यांची ही मुले आहेत. भरत सिंहला दोन पत्नी सुंदरी बाई (३६) आणि अनिता (३०) आहेत. पहिल्या पत्नीपासून चार मुले आणि दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा होता. हे सर्व मुले संशयास्पद अवस्थेत विहिरीत मृतावस्थेत आढळून आले. ही घटना उजेडात आल्यानंतर भरत सिंह आणि त्याच्या दोन्ही पत्नी गायब आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहेत.
दोन्ही पत्नींमध्ये वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे. भरत सिंह याचाही शोध घेतला जात आहे. भरत सिंह आणि त्याच्या दोन्ही पत्नी ताब्यात आल्यानंतरच सत्य समोर येईल, असे पोलीस म्हणाले.