विरोधक एकत्र आल्यास भाजपचाच फायदा – मोदी
राहुल यांच्या अनावश्यक गळाभेटीवरही केली टीका
शहाजानपुर (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका शेतकरी मेळाव्यात विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले ते म्हणाले की देशातील विरोधक एकत्र येत आहेत ही एक चांगली बाब आहे त्यातून भाजपलाच अधिक लाभ होईल आणि त्यातून देशात कमळच फुलेल. राहुल गांधी यांनी काल लोकसभेत पंतप्रधानांना आलिंगन दिल्याची घटना घडली आहे त्यावरही टिका करताना ते म्हणाले की आधी त्यांनी विनाकारण अविश्वास ठराव आणला आणि तो संमत होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अनावश्यक अलिंगन दिले.
ते म्हणाले की देशात आज एकच दल नाही. तर दलावरही दुसरे दल आहे आणि त्यातून विरोधकांची एकूणच दलदल झाली आहे. आणि याच दलदलीत कमळ फुलणार आहे. भाजपच्या विरोधात एकत्र येणाऱ्या विरोधी पक्षांचा भाजपलाच अंतिमत: लाभ होईल असे प्रतिपादनही त्यांनी केले. विरोधकांना पंतप्रधानपदाची खुर्ची हवी आहे. त्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेपायी ते गरीबांना विसरले आहेत. शेतकरी आणि युवकांना विसरले आहेत. काल लोकसभेत तुम्हाला काय दिसले असा सवाल करून ते म्हणाले की त्यांचा डोळा फक्त पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर आहे.
मी केवळ देशातील गरीब जनतेच्याच हिताचे काम करीत आहे, असे सांगून ते म्हणाले की मी आजवर काहीं चुकीचे केले आहे काय? भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणे ही माझी चुक आहे काय असा सवालही त्यांनी लोकांना केला. आधीच्या सरकारांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे साफ दुर्लक्ष केले असा आरोप करून त्यांनी आपल्या सरकारने गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामांची यादी सादर केली.
मोदी यांनी सध्या उत्तरप्रदेशात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. या आधी त्यांनी आझमगड, मिर्जापुर, आणि वाराणसीत मेळावे आणि सभा घेतल्या आज त्यांनी येथे शेतकरी मेळावा घेतला. शहाजानपुर हे शहर मोठा धान्य बाजार म्हणून ओळखलेजाणारे शहर आहे. तसेच या जिल्ह्यात उस उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे.