वाराणसीत उड्डाणपूल कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू
वाराणसी – वाराणसी येथील केंट परिसरात उभारण्यात येत असलेला उड्डाणपुल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या उड्डाणपुलाचा एक हिस्सा अचानक ढासळल्याने त्याखाली अनेक नागरिकांसह वाहने दबली गेली. या दुर्घटनेत 15 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50हून अधिक जण मलब्याखाली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
केंट स्टेशनजवळ काही महिन्यांपासून उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी या पुलाचा एक हिस्सा अचानक खाली कोसळला. याखाली अनेक वाहनांसह नागरिक अडकले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 15 जणांचा मृत्यू झाला. या उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरु असल्याने अनेक वाहनांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून त्यात अनेकजण अडकले आहेत.
उत्तर प्रदेशचे पोलीस डीजीपी ओ. पी. सिंह म्हणाले, या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही मदतीसाठी आले आहे. या दुर्घटनेतील जखमी नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही दु:खद घटना असल्याचे म्हटले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे आदेश देत नागरिकांना संभाव्य मदत करण्याचे निर्देश दिले. याशिवाय या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.