‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ८०० कोटींची गुंतवणूक
मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
“उत्पादनाच्या डिझायनिंग क्षेत्रात चीनमध्ये कमीतकमी आमचे ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. आम्ही आता हे काम भारतात नेलं आहे. उत्पानांच्या विक्रीची आवश्यक ती गरज भारतातीलच कारखान्यातून पूर्ण केली जाईल. आम्ही यापूर्वी चीनमधून आमचे फोन जगभरात वितरीत करत होतो. परंतु आता आम्ही ते भारतातून करणार आहोत,” अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“लॉकडाउनच्या कालावधीदरम्यान आम्ही निर्यातीची मागणी चीनमधून पूर्ण केली. चीनला आता आपण मोबाईल निर्यात केली जावी हे माझं स्वप्न आहे. भारतीय कंपन्या यापूर्वीपासूनच चीनला मोबाईल चार्जरची निर्यात करतात. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना कंपनीच्या स्थितीतही बदल घडवेल. यासाठी आता संपूर्ण व्यवसाय भारतातूनच केला जाईल,” असं राय म्हणाले.