लालू पुत्र तेजच्या लग्नात वऱ्हाडींचा गोंधळ
- जेवणावरून “रणकंदन’ : पत्रकारांनाही मारहाण, भाजप नेते ठाकूर जखमी
पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वोसर्वा लालूप्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचे शनिवारी राजदच्या आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या यांच्याबरोबर लग्न झाले. याप्रसंगी जेवणावरून वऱ्हाडी मंडळींनी एकच गर्दी केल्याने गोंधळ उडाला. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वोसर्वा लालूप्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचे शनिवारी राजदच्या आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या यांच्याबरोबर लग्न झाले. या मंगल कार्यामुळे बिहारमधील दोन राजकीय परिवारातील मैत्रीचे नात्यात रूपांतर झाले. या मंगल सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने लालूंचे समर्थक आणि नागरिक एकत्रित आले होते. प्रचंड अनियंत्रित गर्दीमुळे या लग्न सोहळ्याला थोडेसे गालबोट लागले.
अनियंत्रित गर्दीमुळे व्हीआयपी आणि माध्यमांसाठी असलेले मंडपाजवळील काही भाग तोडण्यात आला आणि तेथील खाण्याचे साहित्य लुटण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयमाला सुरू असताना वधू-वराला आर्शीवाद देण्यासाठी मंडपावर क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते. या वजनामुळे मंचावरील पायऱ्या तुटल्या. यामुळे भाजपा नेते सी पी ठाकूर हे किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ठाकूर आणि शरद यादव यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
विवाह सोहळ्यात 10 ते 12 हजार लोकांची सोय करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात यापेक्षा जास्त लोक आले होते. आइसक्रीम खाण्यासाठी तर झुंबड उडाली होती. जयमाला कार्यक्रमानंतर काही वेळात गर्दीने मंडपांमध्ये लावण्यात आलेले अडथळे तोडले आणि खाण्याच्या वस्तू लुटल्या. हे लोक राजद समर्थक असल्याचे सांगण्यात येते. काही क्षणातच हा परिसर तुटलेल्या क्रॉकरी, उलटे पडलेले टेबल आणि खुर्च्यांनी अस्ताव्यस्त झाला होता. लोकांना पळवून लावण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना यश आले नाही. अनेक कॅमेरामनसह पत्रकारांना मारहाण करण्यात आली.