breaking-newsराष्ट्रिय

लडाखप्रश्नी भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. थोड्याचवेळात लडाखच्या चुशूल परिसरात भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात होईल. भारताच्यावतीने लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चर्चेसाठी जाणार आहेत. भारतीय शिष्टमंडळात १० अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तर चीनकडून मेजर जनरल लियू लीन वाटाघाटीसाठी येणार आहेत. या बैठकीत गलवान घाटी, हॉट स्प्रिंग, पँगाँग लेक परिसरातून चीनने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी भारताकडून केली जाऊ शकते. पेंगांग लेकच्या मागणीवर भारत कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे समजते.

आतापर्यंत भारत आणि चीन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी स्थानिक कमांडर, प्रतिनिधीमंडळ आणि सर्वोच्च कमांडर स्तरावर जवळपास १२ वेळा चर्चा झाली आहे. मात्र, अजूनही या समस्येवर तोडगा निघालेला नाही. 
५ मे रोजी पँगाँग लेकच्या परिसरात भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यानंतर या परिसरातील तणाव वाढला होता. चीनने या भागात सैन्याची कुमक वाढवली असून काही ठिकाणी तंबूही बांधले आहेत.

यानंतर भारतानेही आक्रमक पवित्रा घेत या भागात जास्त सैन्य तैनात केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी चीनचे सैन्य तब्बल दोन किलोमीटर अंतर मागे गेले होते. यानंतर भारतीय सैन्यही एक किलोमीटर अंतरापर्यंत मागे गेल्याचे सांगितले जाते. २०१७ मध्ये डोकलाम परिसरातही अशाचप्रकारे भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. यानंतर भारत आणि चीनमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button