रोज पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा; कोरोना भारतातून हद्दपार होईल – भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत रोजच झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. जगातील कित्येक देश कोरोनावर संजीवनी ठरेल अशा लसीच्या शोधात आहे. यातच आता कोरोनावर मात करण्यासाठी एक नवीन उपाय भाजप नेत्यांनी दिला आहे. भाजपच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोरोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला आहे. यासंदर्भात खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली.
“आपण सर्व मिळून कोरोना महामारीला संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. 25 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान दररोज घरात संध्याकाळी 7 वाजता 5 वेळा घरात हनुमान चालीसा पठण करावे. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आप-आपल्या घरात दिवा लावून त्यांचा समारोप करावा” असे ट्विट प्रज्ञा ठाकूर यांनी केले आहे.