‘राजधानी’, ‘शताब्दी’सह रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रस्ताव नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/rajdhani-express.jpg)
- पीयूष गोयल यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली – रेल्वेचे किंवा राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाडय़ांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा होती त्या पाश्र्वभूमीवर गोयल यांनी वरील बाब स्पष्ट केली.
खासगीकरण आणि संपूर्ण रेल्वे यांचे खासगीकरण करण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना गोयल यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिले आणि खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.
राजधानी, शताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या गाडय़ांचे सरकार खासगीकरण करणार आहे ही वस्तुस्थिती आहे का, असा प्रश्न सपाचे खासदार सुरेंद्र नाथ नागर यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना गोयल म्हणाले की, राजधानी-शताब्दीचे आणि रेल्वेचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
रेल्वेत भरती
रेल्वेमध्ये लवकरच नऊ हजार पदांची भरती केली जाणार आहे, हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदे भरली जाणार असून त्यामध्ये ५० टक्के महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे, असेही गोयल यांनी ट्वीट केले आहे.