यंदा श्रीरामाच्या नावाने एक दिवा पेटवा, काम लवकरच सुरू होईल : योगी आदित्यनाथ
अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या देशभरात चांगलाच चर्चेत आहे. कधी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे, तर सरकार राम मंदिरासंबंधीचा कायदा आणू शकतं अशीही चर्चा होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. दिवाळीनंतर राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होऊ शकते असे संकेत त्यांनी दिले आहेत.
शनिवारी, राजस्थानच्या बिकानेर येथे योगी आदित्यनाथ पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी, ‘यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, तेथे काम लवकरच सुरू होईन. आपल्याला दिवाळीनंतर हे काम करायचंय’ असं ते म्हणाले. यंदा अयोध्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्साहात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. यंदा जवळपास 3 लाख दिवे पेटवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे, शनिवारी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी मी राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय होते. त्याबाबतची सुनावणी अद्यापही सुरू आहे. राम मंदिर बांधलं जावं हे माझं स्वप्न आहे. यासाठी माझ्याकडून जी मदत हवी असेल ते करायला मी तयार आहे असं म्हटलं आहे. तर, राम मंदिराचं प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकरात लवकर यावर निर्णय यावा अशी आमची इच्छा आहे. जर न्यायालयाच्या निकालाला विलंब होत असेल तर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी माझी वैयक्तिक मागणी असल्याचं केंद्रीय मंत्री पीपी चौधरी शनिवारी म्हणाले आहेत.